धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षबदलानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षत्यागावर सडकून टीका करत शिवसैनिकांना एकजूट राहण्याचे आवाहन केले.
सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले, “तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.” त्यांनी आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक करत, “या दोघांचा मला अभिमान वाटतो,” असे सांगितले. तसेच २०२२ च्या पक्षफुटीच्या काळात आमदार कैलास पाटील यांनी दाखविलेल्या निष्ठेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला वाटत होतं माझा ओमराजे हा वाघ आहे, पण तो लांडगा निघाला.” पुढे त्यांनी, “मला लाज वाटते की मी ओमराजेला उमेदवारी दिली,” असेही स्पष्ट शब्दांत म्हटले.
ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगताना ते म्हणाले, “माझा नंबर घ्या म्हणणाऱ्याला मी चार वेळा फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही.” त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचाही उल्लेख त्यांनी केला. “ओमला विचारलं, तब्येत बरोबर नाही का? तो म्हणाला, नाही ठीक आहे. पण आता या माणसाच्या भानगडी उघड्या पडल्या. हा माणूस म्हणायच्या लायकीचा नाही,” अशी टीका त्यांनी केली.
ओमराजे यांच्या पक्षांतरामागील राजकीय गणितावर भाष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले, “धाराशिवच्या खासदारांनी स्वतःचा भाव वाढवला आणि नंतर गेले. दोन तृतीयांश खासदार होण्यासाठी त्यांच्या मताची गरज होती, त्यामुळे त्यांनी स्वतःचा भाव वाढवून घेतला.”
लोकसभा निवडणुकीतील आठवणी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ओमराजे यांच्या प्रचारसभेत एक साधा शेतकरी स्वतःच्या खिशातून पैसे काढून निवडणुकीसाठी मदत करत होता. “तिकडे पैसा मिळेल, पण प्रेम मिळणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
पाटसांगवी येथील समाधान पाटील यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत त्यांनी, “त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही दिली.
शेतकरी प्रश्नावर बोलताना त्यांनी अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करण्याची मागणी केल्याची आठवण करून दिली. सध्याची कर्जमाफी ही “फसवी कर्जमाफी” असल्याचा आरोप करत, “तेल कमी खा आणि पैसा जास्त खा, हेच सरकारचे धोरण आहे,” अशी टीका त्यांनी केली.
भाजपवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या भाजपचे अख्ख्या देशात दोन खासदार होते, त्यांना आपण बोटाला धरून मोठं केलं.” तसेच नवीन चिन्हावर निवडणूक लढवूनही “मी माझे नऊ खासदार निवडून आणले,” असे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या भवितव्याबाबत आत्मविश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात काहीही झालं तरी ठाकरे संपणार नाहीत. कितीही आमचे खासदार फोडले तरी आमची शिवसेना संपणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना ही खासदार-आमदार फोडून संपवता येणार नाही.”
सभेच्या शेवटी धाराशिव जिल्ह्यातील आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत कायम राहणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र सभास्थळी पाहायला मिळाले.












Users Today : 8
Users Yesterday : 34
This Month : 702
Total Users : 35988