धाराशिव | राजकीय कट्टा वृत्तसेवा
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच पूर्ण झाला असून सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदांच्या नियुक्त्याही पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुढील 2029 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीच्या दृष्टीने मल्हार पाटील हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यक्रम आयोजित केले असून त्यातून त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील इच्छुकतेचे संकेत मिळत आहेत.
याशिवाय, त्यांनी अलीकडेच बार्शी तालुक्यातील पानगाव येथे दौरा केल्यामुळे ते धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा रंगली आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर मल्हार पाटील यांच्यासोबत त्यांच्या सहचारिणींचाही फोटो झळकत असल्याने, भविष्यात महिला आरक्षण लागू झाल्यास त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची रणनीती देखील असू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पक्षांतर्गत स्थान अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे त्यांचे पुढील लक्ष्यही लोकसभा निवडणूक असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मात्र, या निवडणुकीस अजून सुमारे तीन वर्षांचा कालावधी असल्याने या काळात अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात. राज्य आणि केंद्रातील राजकारण, आघाड्यांची स्थिती, तसेच इतर रणनीती यांचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार आहे.
सध्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा संपर्क नगरपालिका निवडणुकीनंतर काहीसा कमी झाल्याची चर्चा असून त्यांच्या पुढील भूमिकेबाबतही उत्सुकता आहे. काही कार्यकर्ते बदलाची गरज व्यक्त करताना दिसत आहेत.
एकूणच, पुढील काही वर्षांत धाराशिवच्या राजकारणात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता असून 2029 ची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार, हे स्पष्ट दिसत आहे.













Users Today : 16
Users Yesterday : 32
This Month : 1071
Total Users : 33915