मृदू स्वभाव, मितभाषी वृत्ती आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून ओळख; वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
कळंब : आयुष्य किती क्षणभंगुर असते आणि आनंद-दुःख यांच्यातील अंतर किती कमी असते, याची हृदयद्रावक जाणीव करून देणारी घटना कळंब येथे घडली. मूळचे तांबेवाडी, ता. भूम येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आप्पासाहेब मुळे (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षकवर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
आप्पासाहेब मुळे हे सध्या जिजाऊ नगर, कळंब येथे वास्तव्यास होते. अत्यंत मृदू स्वभावाचे, मितभाषी, सर्वसमावेशक आणि साधे-सरळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. कोणाच्याही अनावश्यक वादात किंवा व्यक्तिगत बाबींमध्ये न पडता ‘आपले काम आणि आपण’ या विचाराने ते आयुष्य जगले. त्यामुळे त्यांच्याविषयी सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मित्रमंडळींमध्ये विशेष आदर होता.
कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून वेगळी ओळख
प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने बजावली. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच त्यांचा भर नव्हता, तर त्यांच्यात चांगले संस्कार, शिस्त आणि शिकण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असत.
प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहून शांतपणे आपले कर्तव्य बजावणे, सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणे आणि प्रत्येकाशी नम्रतेने वागणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. कुणाच्या अध्यात-मध्यात न पडता, कोणाविषयी कटुता न बाळगता आणि आपली जबाबदारी निष्ठेने पूर्ण करत त्यांनी आपले आयुष्य जगले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने शिक्षक क्षेत्रातील एक सुस्वभावी आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
लेकीच्या यशाची बातमी… आणि अवघ्या काही तासांत दुःखाचा डोंगर
या संपूर्ण घटनेतील सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे, त्यांच्या मुलीच्या आयुष्यातील मोठ्या यशाची बातमी मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आप्पासाहेब मुळे यांचे निधन झाले.
त्यांची मुलगी सई मुळे हिची अश्विनी मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याची माहिती सायंकाळी साधारण चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान कुटुंबाला समजली. लेकीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने पडलेले हे मोठे पाऊल असल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. वडील म्हणून आप्पासाहेब मुळे यांच्यासाठीही हा अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा क्षण होता.
मात्र नियतीने या आनंदाला फार वेळ दिला नाही. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना तातडीने आवटे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुलीच्या एमबीबीएस प्रवेशाची आनंदवार्ता मिळाल्यानंतर अवघ्या चार तासांच्या आत वडिलांच्या निधनाची बातमी कुटुंबावर कोसळली. काही तासांपूर्वी लेकीच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या घरात अचानक शोककळा पसरली. सुख आणि दुःख यांच्यातील अंतर किती क्षणिक असते, याची जाणीव या घटनेने प्रत्येकाला करून दिली.
कुटुंबाचा आधारवड हरपला
आप्पासाहेब मुळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलेला असून पत्नी गृहिणी आहेत. मुलांचे शिक्षण आणि भविष्य घडविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर घेतलेले कष्ट आणि केलेली धडपड आता कुटुंबाच्या आठवणीत कायम राहणार आहे.
एकीकडे मुलीने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे यश मिळविले आणि दुसरीकडे त्याच आनंदाच्या क्षणी कुटुंबाचा आधारवड कायमचा हरपला, ही बाब प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारी आहे.
जीवन नश्वर आहे… आहे तो क्षण आनंदाने जगा
आप्पासाहेब मुळे यांच्या आकस्मिक निधनाने पुन्हा एकदा जीवनाच्या अनिश्चिततेची जाणीव करून दिली आहे. माणूस उद्याची कितीही स्वप्ने पाहतो, योजना आखतो; मात्र पुढचा क्षण आपल्या हातात नसतो.
म्हणूनच आरोग्याची काळजी घ्या, आपल्या माणसांसाठी वेळ द्या, आहे तो क्षण आनंदाने जगा आणि शक्यतो अनावश्यक वादविवाद, राग, मतभेद व कटुता टाळा. आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा आपण ते किती प्रेमाने आणि माणुसकीने जगलो, हे अधिक महत्त्वाचे असते.
आप्पासाहेब मुळे यांनीही आपल्या शांत, संयमी आणि साध्या जीवनातून हेच दाखवून दिले. मोठेपणाचा दिखावा न करता, कोणाच्याही वादात न पडता, शिक्षक म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आणि माणसे जोडत त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
त्यांचे जाणे हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही, तर एका सुस्वभावी शिक्षकाला, चांगल्या सहकाऱ्याला आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मुकल्याची वेदना आहे.
आप्पासाहेब मुळे सर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली…!
प्रा.सतिश बबनराव मातने
प्राचार्य भैरवनाथ अध्यापक विदयालय,कळंब तथा संपादक राजकीय कट्टा











Users Today : 64
Users Yesterday : 25
This Month : 539
Total Users : 38514