गटनेते संजय मुंदडांसह दहा नगरसेवकांचा सोलापुरात संभाव्य पक्षप्रवेश; युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या राजकीय खेळीची चर्चा
कळंब (प्रतिनिधी) : कळंब शहराच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथीची चिन्हे दिसू लागली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नऊ नगरसेवक व काँग्रेस पक्षाच्या १ नगरसेविका भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गटनेते संजय मुंदडा यांच्यासह एकूण दहा नगरसेवकांचा उद्या सोलापूर येथे भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

कळंब नगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते संजय मुंदडा आणि त्यांच्या सोबतचे नगरसेवक नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आता या गटाने भाजपची वाट निवडल्याची माहिती समोर येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून या दहा नगरसेवकांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगत होती. हे नगरसेवक कोणत्या पक्षात जाणार, कोणाच्या नेतृत्वाखाली पुढील राजकीय वाटचाल करणार, याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र आता उद्या सोलापुरात होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे या चर्चांना निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.

मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी राजकीय खेळी
या संभाव्य पक्षप्रवेशामागे भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही काळात कळंब शहर आणि परिसरातील भाजपच्या संघटनात्मक विस्तारासाठी पाटील यांनी हालचाली वाढवल्या असून, दहा नगरसेवकांचा प्रवेश प्रत्यक्षात झाल्यास त्याला त्यांच्या राजकीय रणनीतीचे मोठे यश मानले जाण्याची शक्यता आहे.
एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यास कळंब नगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या दृष्टीनेही या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

ओमराजेंबरोबर जाण्याची होती चर्चा; मात्र निवडली वेगळी वाट
धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, कळंबमधील हे नगरसेवकदेखील त्यांच्या सोबत जातील, अशी चर्चा होती.
मात्र आता या नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेऐवजी थेट भाजपचा पर्याय निवडल्याची माहिती समोर येत असल्याने कळंबच्या राजकीय समीकरणांना वेगळेच वळण मिळाले आहे.
ठाकरे गटासाठी मोठा धक्का?
हा पक्षप्रवेश प्रत्यक्षात झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी कळंबमध्ये हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. एकाचवेळी गटनेत्यासह नऊ नगरसेवकांनी वेगळी वाट स्वीकारल्यास स्थानिक पातळीवरील पक्षाची संघटनात्मक ताकद आणि आगामी राजकीय गणितांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, भाजपला दहा नगरसेवकांचा मोठा गट आपल्या बाजूने वळविण्यात यश आल्यास कळंब शहरातील भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असून, युवा नेते मल्हार पाटील यांचेही राजकीय वजन वाढल्याचे मानले जाईल.
आता सर्वांचे लक्ष उद्याच्या सोलापूरमधील संभाव्य पक्षप्रवेशाकडे लागले आहे. गटनेते संजय मुंदडांसह दहा नगरसेवक प्रत्यक्षात भाजपचा झेंडा हाती घेतात का, याकडे कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.













Users Today : 3
Users Yesterday : 89
This Month : 633
Total Users : 38608