धाराशिव – जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सभापती पदाच्या निवडीकडे लागले असून, तब्बल ४७ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सभापती पदासाठी मतदान होणार आहे. अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषाताई गायकवाड यांची निवड झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर सर्व सदस्य सहलीवर गेल्याने सभापती निवड लांबली होती. मात्र आज मतदान होऊन सदस्य आपल्या गावी परतणार असल्याची माहिती आहे.
विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत सभापती पदासाठी फॉर्मुला निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार भाजपाला दोन, शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक सभापती पद मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षाकडून ईटकुर गटातील अनंत उर्फ पिंटू लंगडे, पळसप गटातील अजित लाकाळ आणि कानेगाव गटातील सुवर्णाताई पाटील या तिघांची नावे आघाडीवर असून, यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाथरूड गटातील अमोल भोरे, ईट गटातील शुभांगी देशमुख आणि डोंजा गटातील भाऊसाहेब खरसडे यांची नावे चर्चेत आहेत. या तिघांपैकी एकाची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भाजपामध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या चर्चेतून दोन नावे अंतिम होणार असल्याची माहिती मिळते.
याच पार्श्वभूमीवर डॉ. तानाजी सावंत यांची भूमिका देखील महत्त्वाची मानली जात आहे. त्यांनी सुरुवातीला तेरखेडा जिल्हा परिषद गटातील विकी चव्हाण यांची गटनेते पदी बसवून समाधान मानले असे दिसत असले तरी पक्षावर आपली कमांड ठेवली आहे. पुढील अडीच वर्षांत महायुतीतील महत्त्वाची पदे आपल्या भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातुन निवडून आलेल्या सदस्यांना मिळवून देण्यासाठी ते सक्रिय होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
एकंदरीत, आज होणाऱ्या सभापती निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून, महायुतीतील समतोल साधत अंतिम निर्णय काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.












Users Today : 31
Users Yesterday : 24
This Month : 1332
Total Users : 31017