महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू सुभाष सावंत यांचे परवा दुःखद निधन झाले. ही वार्ता समजल्याबरोबर डॉ.तानाजी सावंत ताबडतोब गावी आले आणि आपल्या भावाचं पार्थिव पाहून अक्षरशः ओक्साबोक्सी रडले. अंत्यविधीच्या प्रसंगी पार्थिवाला अग्नी देताच ते जागेवरून उठले आणि धावतच चितेकडे गेले आणि मोठमोठयाने रडू लागले.हे पाहून सर्वजन सद्गदित झाले. प्रा.तानाजी सावंत यांना एकूण पाच भावंड आणि एक बहीण यामध्ये प्रा.तानाजी सावंत हे सर्वात धाकटे अर्थात शेंडेफळ आहेत. पाच भावंड म्हणजे पाच पांडवांसारखे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे. पाच भावांचा एकमेकावर प्रचंड जीव आहे. त्यांचे बंधुप्रेम हे वाखाण्यासारखे आणि प्रेरणादायक आहे. ते संस्कार त्यांच्या पुढच्या पिढीवर अर्थात त्यांच्या सगळ्या मुलांवरतीदेखील आहेत.
प्रत्येक भावाच्या गळा पडून डॉ.तानाजी सावंत रडत होते. भावाच्या आठवणीने ते अत्यंत व्याकुळ झाले होते. तिसऱ्या दिवशी सावडण्याच्या वेळेसदेखील ते हुंदके देऊन रडत होते. मातीच्या कार्यक्रमानंतर ते ज्यावेळेस जायला निघाले त्यावेळेस गाडीत बसेपर्यंत ते आपल्या सर्व भावांच्या गळ्यात पडून रडत होते. दिवंगत बंधूच्या आठवणीने ते अत्यंत व्याकूळ झाले होते.
प्रा.डॉ.तानाजी सावंत हे महाराष्ट्रातील एक परखड आणि सडेतोड बोलणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे.पण सडेतोड बोलणारे, परखड बोलणारे लोकच जास्त भावनिक आणि प्रेमळ असतात, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. आपण कितीही मोठे झालो तरी आई, वडील आणि भावांवर कसे प्रेम करावे, तीन-तीन पिढ्या एकत्र कसे रहावे.याचा वस्तुपाठ सावंत परिवाराकडून घेतला पाहिजे. डॉ.तानाजी सावंत जेवढे परखड तेवढेच हळवे आहेत हेच दिसून आले.