वाढदिवस व्यक्तिविशेष
एखादा व्यक्ती एखाद्या पक्षात सक्रिय कार्यकर्ता,मोठा पदाधिकारी असून देखील त्याला इतर पक्षात देखील चांगले मित्र असणे हे त्यांच्या स्वभावाचे विशेष असते. एखाद्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हटलं की त्यांना राजकीय विरोधक आलेच,कोणत्याही पक्षातल्या सक्रिय कार्यकर्त्याला विरोधक न मानता तो देखील कुठल्यातरी एखाद्या पक्षाचे कार्य करत आहे आणि त्याचा देखील सन्मान ठेवला पाहिजे. राजकारणात कार्यरत असणाऱ्या अगदीच बोटावर मोजण्या इतपत लोकांना हे उमजले, २४ वर्षापासून अविरतपणे राजकारणात कार्यरत असताना देखील सर्व पक्षात आपल्या मित्रांचा गोतावळा निर्माण करण्यात यश आल आहे. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी हे होय.आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय कट्टाच्या वतीने त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यावर टाकलेला हा प्रकाश…..

शून्यातून विविध उद्योगांची उभारणी
सर्वसामान्य परिस्थिती असताना देखील बुद्धी कौशल्य,धाडसाने निर्णय घेणे, आपले सहकारी मोठे व्हावे याकरिता अविरत प्रयत्नशील राहणे, आणि सर्वांशी ‘Give Respect,Take Respect ‘ या म्हणीप्रमाणे दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्व हे राजकीय असून देखील अराजकीय असेच सर्वांना वाटते. या गुणांच्या बळावरच त्यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये पाऊल टाकले आणि यशस्वी देखील झाले. एखाद्या व्यक्तीचे यश हे त्याच्या समवेत असणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते.एखाद्या उद्योगाची उभारणी करत असताना जे लोक सोबत होते तेच लोक जर आज वीस वर्षानंतरही त्यांच्यासोबत असतील तर ती व्यक्ती नक्कीच चांगली आहे असे परिमाण वापरले जाते यामध्ये दत्ताभाऊ हे इतरांपेक्षा काकणभर सरसच ठरतात. त्यांनी कळंब तालुक्यातील खामसवाडी व तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी या दोन ठिकाणी गूळ पावडर कारखान्यांची करून अनेक बेरोजगार तरुणांना तर रोजगार उपलब्ध करून देऊन त्यासोबतच शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा कारखाना दिला आहे. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सुरुवातीला आपल्या नावाचा विश्वास तयार करा आणि आज त्या विश्वासाच्या बळावर दोन कारखाने उभे केले या कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणण्यासाठी त्यांची अहोरात्र धडपड दिसून येते. केवळ कारखानदारीच नव्हे तर बँकिंग क्षेत्रातही स्वतःच्या नावाचा एक वेगळा दबदबा निर्माण करत आपल्या बँकेमध्ये दररोज किती ठेवी आहेत,किती शिल्लक आहे, किती कर्ज वाटप आहे, एनपीए किती आहे, याची माहिती बँकेच्या बाहेर लावली जाते त्यामुळे आपोआपच बँकेच्या ग्राहकांमध्ये ठेवीदारांमध्ये एक विश्वासाचं वातावरण तयार झालं आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या कोणत्याही बँकिंग शाखेत गेल्यानंतर सर्व कर्मचारी हे आपुलकीने वागताना दिसतात. बँकिंग व सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणजे विश्वासू व्यक्ती असा ब्रँड तयार करण्यात यश मिळवलं आहे.

समाजकारण राजकारण व सहकार क्षेत्रात स्वतःचा नावलौकिक करणारे व्यक्तिमत्व

समाजात कोणतीही, कसलीही सामाजिक ओळख नसली तरी अगदी तरुण वयात लहान-मोठी कामे करताना सर्वसामान्यांचे दुःख, अडचणी अगदी जवळून पाहिल्याने परिवर्तनाची मशाल हाती घेऊन न थकता, न हारता त्वेषाने निघालेल्या एका तरुणाने धाराशिव शहरच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात आज सहकार,पतपुरवठा,उद्योग, शेती, आरोग्य, राजकारण, समाजकारण अशी विविध क्षेत्रे पादाक्रांत करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपण भले नि आपले काम भले हेच धोरण राबवित आज हजारो बेरोजगार हातांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून आपलेच सर्वसामान्यांतले श्री सिद्धिविनायक परिवारचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी होय.
जनहिताचे कोणतेही कार्य मनापासून हाती घेतले तर त्यात यश मिळतेच.भले कितीही अडचणी आल्या तरी सर्वसामान्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छांच्या सोबतीने त्यावर मात करता येते, याचे उदाहरण म्हणून धाराशिव जिल्ह्यात बँकिंग,आरोग्य, शेती, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रात नावारुपाला आलेला सिद्धिविनायक परिवाराकडे पाहता येईल. समोर आलेल्या प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देऊन कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रसंगात विचलित न होता इतरांना कायम सोबत घेऊन वाटचाल करणे आजकाल दुर्मिळ आहे. परंतु कोणताही राजकीय वारसा, उद्योजकीय पाठबळ नसताना केवळ जनसेवेचा वसा घेऊन निघालेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ही किमया करुन दाखवली आहे.
दोन गुळ पावडर उद्योगांची केली उभारणी

सहकार क्षेत्रापासून सुरूवात केलेल्या सिद्धिविनायक परिवाराने अल्पावधीतच जनसामान्यांच्या विश्वासाला पात्र राहून कृषीक्षेत्रातही यशस्वी पाऊल ठेवले आहे.देव कुरुळी माळरानाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यात जलसंधारणाची कामे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली आहेत.त्यामुळे या भागात ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. ही गरज ओळखून दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सिद्धिविनायक अग्रीटेक इंडस्ट्रीज नावाने गुळ पावडर कारखाना उभारुन खऱ्या अर्थाने इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. असे धाडस कोणी ध्येयवेडी व्यक्तीच करु शकते.या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे तो केवळ दत्ताभाऊ यांच्यावरील विश्वासामुळेच या कारखान्याचा नोव्हेंबर २०२१ मध्ये चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर ऑक्टोबर २०२२ महिन्यात पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. धाराशिव जिल्ह्यातील कारखानदारीमध्ये एक नव्या धडाडीचा व जनहिताची तळमळ असलेला चेहरा या निमित्ताने समोर आला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा देखील त्यांच्याकडून वाढल्या आहेत. तुळजापूर तालुक्यात असलेल्या एकमेव सहकारी साखर कारखान्याव्यतिरिक्त अन्य एक साखर कारखाना उभारला गेला तरी या भागातील ऊस क्षेत्र देखील वाढत गेल्याने शेतकऱ्यांची परवड कायम होती. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यास अनेक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. गतवर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला असताना दत्ताभाऊ यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन चाचणी हंगामाच्या काळात देखील सुमारे ६२ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

यावर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी आपल्या हक्काचा कारखाना उभारल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काळजी दूर झाली आहे. एकीकडे साखर कारखानदारी मोठ्या अडचणीला तोंड देत असताना नियोजनबद्धपणे काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते, याचा प्रत्यय सिद्धिविनायक परिवारकडे पाहिल्यास आल्याशिवाय राहत नाही. तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत असतानाच कळंब तालुक्यात खामसवाडी येथेही सिद्धीविनायकच्या युनिटची वेगात उभारणी करून प्रथम गळीत हंगाम देखील यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी १९ फेब्रुवारी रोजी या कारखान्याचा चाचणी हंगाम सुरू करण्याचे ध्येय दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ठेवले व ते पूर्ण केले. आज दोन्हीही गुळ पावडर कारखाने अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवले जात असून शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव पारदर्शकपणा वेळेवर बिल देणे या सर्व गोष्टीमुळे आज शेतकऱ्यांच्या विश्वासात हे दोन्ही गुळ पावडर कारखाने ठरले आहेत.
कृषी क्षेत्रात सुरू केलेली दमदार वाटचाल निश्चितच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे.सहकार क्षेत्रातील ही कामगिरी लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या प्रदेश सहसंयोजक पदी त्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रात अमित शहा हे गृहमंत्री व सहकार मंत्री म्हणून कार्य करत असताना त्यांना राज्यस्तरावर सहकार क्षेत्रातील सहसंयोजक म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली आहे ती संधी सहकार क्षेत्राला चालना देणारी आहे

सिद्धिविनायक वैद्यकीय क्षेत्रातही कार्य करणार

सिद्धीविनायक परिवार वैद्यकीय क्षेत्रातही पाऊल ठेवत असून सिद्धिविनायक परिवारच्या रुग्णालयाची मुहुर्तमेढ लवकरच रोवली जाणार असल्याने धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना अत्युच्च दर्जाची सेवा आणि उपचार धाराशिव येथे मिळू शकणार आहेत.
बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे नेतृत्व

धाराशिव जिल्हा हा देशात आकांक्षीत जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र ही आकांक्षीत जिल्हा ओळख पुसण्यासाठी कोणतेही नेते फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत मात्र रोजगार निर्मिती करून आपल्या भागातील तरुणांना हाताला काम व त्यासाठी योग्य दाम देणे हे कार्य अपेक्षित आहे हेच काम दत्ताभाऊ कुलकर्णी मोठ्या हिमतीने करत आहेत. आज बँकिंग,कारखानदारी व इतर उद्योगाच्या माध्यमातून जवळपास दोन ते तीन हजार युवकांना रोजगार देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले आहे.बेरोजगारी ही समस्या आहे मात्र त्यावर उपाय म्हणजे रोजगार निर्मिती करणे हे आहे आणि हे रोजगार निर्मिती करण्याचे कार्य त्यांच्या हातून होत आहे.ज्यांच्या अंगी जे कौशल्य आहे त्यांच्याकडून ते काम करून घेण्याचं कसब देखील दत्ताभाऊ कुलकर्णी यांना जमलं आहे.त्यामुळेच आज सिद्धिविनायक परिवार हा नावारूपास येत आहे. ही संस्था कुणाची दुसऱ्याची नाही तर ही माझी संस्था आहे अशी भावना सिद्धिविनायक परिवारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळे सिद्धिविनायक परिवाराची आज झपाट्याने प्रगती होताना दिसून येत आहे
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केला राजकीय प्रवास

राजकीय प्रवासात वाटचाल करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये दत्ताभाऊ सुरुवातीपासूनच तन-मन-धनाने वाटचाल करत आले. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आज हजारो कार्यकर्त्यांची फळी धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. त्यांची पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही श्रेष्ठींनी सोपविली. या संधीचे सोने करत दत्ताभाऊ यांनी धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर पंचायत, ग्रामपंचायतींसह गावागावातीत सोसायट्यांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. आपण भले आणि आपले काम भले हीच शिकवण ते कार्यकर्त्यांना सातत्याने देत असतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समस्यांची जाण असलेले उदयोन्मुख नेते, राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जोपासणारे, शेती, सहकार, उद्योग, आरोग्ययासह विविध क्षेत्राच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारे, दुरितांचे पालनहार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आज विविध पक्षात कार्यरत असणारे कार्यकर्ते पदाधिकारी देखील दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल गोडवे गाताना दिसून येतात.
अशा या सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..











Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244