“मंत्रीपद हे नशिबाने नव्हे, तर कर्तृत्वाने मिळतं” – या वाक्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रताप बाबुराव सरनाईक.
25एप्रिल 1964 रोजी वर्धा येथे जन्मलेले सरनाईक यांचे बालपण अत्यंत साधं आणि संघर्षमय होतं. डोंबिवलीतील एस.व्ही.जोशी शाळेतून १० वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मोठ्या स्वप्नांसाठी छोटी सुरुवात करत, बुर्जी पावचा गाडा चालवणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी ध्येय, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

आज त्यांचं नाव ‘विहंग ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ या यशस्वी उद्योजक संस्थेच्या माध्यमातून बांधकाम, हॉटेलिंग आणि शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आहे.कुटुंबात – पत्नी, दोन मुले, सून आणि नातवंडांसह ते एकत्रित राहतात. प्रताप सरनाईक यांचे वडील बाबुराव सरनाईक यांचे आचार्य अत्रे व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्याशी कौटुंबिक स्नेह संबंध होते. त्यामुळे साहजिकच अशा दिग्गज व्यक्तींचा सहवास प्रताप सरनाईक यांना बालपणीच लाभला आणि त्यामुळे त्यांची सामाजिक जडणघडण होण्यामध्ये या गोष्टी देखील महत्त्वाच्या ठरल्या.
राजकारणातला धगधगता प्रवास
सरनाईक यांचा राजकीय प्रवास सुरू झाला NSUI (नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया) या युवक संघटनेतून झाला. १९९७ मध्ये ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले आणि त्यांनी तीन टर्म्स नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली.
त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील एक किस्सा खूप गाजला तो म्हणजे २००१ मध्ये पराभव झाला.पराभवानंतरही खचून न जाता प्रताप सरनाईक यांनी अनेक राजकीय व्यूहरचना आखल्या. महानगरपालिकेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली. त्या काळात शिवसेनेचे दिग्गज नगरसेवक प्रताप शेलार यांनी राजीनामा दिला होता.(की द्यायला लावला होता याची देखील नेहमी चर्चा होते.) ज्यामुळे त्या वॉर्डमध्ये पोटनिवडणूक लागली होती. त्या वॉर्डमधील चार पैकी चारही नगरसेवक पूर्वी शिवसेनेचेच होते.

प्रताप सरनाईक यांना महानगरपालिकेत पुन्हा येण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यांनी मोठ्या चंगाने प्रचार-प्रसार करीत त्या पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी त्या वेळी शिवसेनेचे रमेश वैती यांचा पराभव केला. या विजयामध्ये धाराशिव जिल्ह्याचे भूमिपुत्र भगवान देवकते यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली.हीच निवडणूक प्रताप सरनाईक यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारी ठरली.

आमदारपदाच्या चार टर्म्स:
२००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेत प्रवेश केला आणि २०१४, २०१९, २०२४ असे सलग चार वेळा ते या मतदार संघातून निवडून आले व २०२४ मध्ये त्यांनी परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.
राजकारणातील गुरु डॉ.पद्मसिंह पाटील
राजकारणात प्रताप सरनाईक यांचे गुरु धाराशिवचे दिग्गज नेते डॉ.पद्मसिंह पाटील हेच होते. ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक म्हणजे ‘दो हंसो का जोडा’ म्हणून जिल्ह्यात ओळखले जात होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा मित्र आणि राजकारणात कोणी काहींच्या शत्रू नसतो त्याप्रमाणे आज दोघे जरी वेगळे झालेले असले तरी देखील दोघातील स्नेहबंध मात्र कायम आहेत.
राजकीय स्फोटक क्षण – चर्चेतील पत्र

२०२२ मध्ये, महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या काही दिवस आधी, प्रताप सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं, ज्यात त्यांनी भाजपसोबत युती करण्याचा सल्ला दिला होता.हे पत्र पुढे सत्तांतराच्या प्रक्रियेचा एक निर्णायक टप्पा ठरलं. आमदारांच्या मनात नेमकी काय खदखद आहे, हे या पत्राच्या माध्यमातून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आणि पुढे राज्यात सत्तांतर देखील झाले.सत्तेच्या डावपेचात त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता,त्यांच्या राजकीय परिपक्वतेचं लक्षण ठरली.
धाराशिव पालकमंत्री – श्रद्धा आणि संधी यांची संगम

२०२४ मध्ये परिवहन मंत्री झाल्यानंतर, प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारलं.
त्यामागचं कारण त्यांनी मनापासून व्यक्त केलं ते म्हणजे
“आई तुळजाभवानीची सेवा करण्यासाठीच देवीने मला धाराशिवकडे बोलावलं असावं.”
धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते विकासकामांना गती देण्यासाठी सज्ज आहेत.त्यांचं सच्चं नेतृत्व, सडेतोड विचार, आणि जनतेशी असलेली नाळ,लोकाभिमुख नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.धाराशिव जिल्ह्यासाठी 50 नव्या बसची घोषणा केली आणि त्या वेगवेगळ्या आगारांना दिल्या देखील.

सोलापूर ते धाराशिव असा बस मधून प्रवास करणारे ते धाराशिवचे पहिले पालकमंत्री ठरले. परिवहन मंत्री म्हणून प्रवाशांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या अधिकाधिक कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं आहे.त्यासोबत धाराशिव जिल्हा अधिक विकसित कसा करता येईल या दृष्टीकोनातून एक त्यांनी रोड मॅप देखील तयार केला आहे मात्र त्याला मूर्त रूप देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे.
उपेक्षा ते प्रतिष्ठा – एक प्रेरणादायी कहाणी

सामान्यतेतून असामान्यतेकडे झेप घेणारे प्रताप सरनाईक, आपल्या कर्तृत्वाने, संयमाने आणि संघर्षाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावशाली नाव झाले आहेत.
राजकीय कट्टाच्यावतीने परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री ना.प्रताप सरनाईक यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242