कळंब (प्रतिनिधी): वैद्यकीय क्षेत्राला समाजात आकर्षण व ग्लॅमर असले तरी या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवाभाव हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे, असे प्रतिपादन कळंब येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.रमेश जाधवर यांनी केले. ते कळंब येथे आयोजित एमबीबीएस व एमडी प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
सेवाभाव हेच डॉक्टरांचे खरे वैशिष्ट्य

डॉ. जाधवर म्हणाले की, “आज माझा सुट्टीचा दिवस असला तरी एका रुग्णाला माझी गरज होती. मी ती जबाबदारी ओळखली आणि त्याच्याकडे धाव घेतली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना डॉक्टरांसाठी सुट्टी नसते. रुग्णांची सेवा हीच आपली खरी पूजा आहे. या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नूतन डॉक्टरांनी हा दृष्टिकोन कायम ठेवला पाहिजे.”
डॉक्टर देवासमान असतो -ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ

समारोपाच्या भाषणात ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ यांनी सांगितले की, “माणसात देव शोधला जातो आणि तो देव म्हणजे डॉक्टर असतो. भविष्यात रुग्णांशी वागताना लोक आपल्याला देव मानतात या जाणीवेने सेवाभाव दाखवावा. वैद्यकीय क्षेत्र ही फक्त नोकरी किंवा व्यवसायाची संधी नसून मानवी जीवनाला आधार देणारी पवित्र जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. संभाजी चौधरी व माजी शिक्षण विस्तार अधिकारी अरविंदराव फुलारी यांनी ही आपलं मनोगत व्यक्त केलं.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

सत्काराला उत्तर देताना शिवाई भांडे व ओंकार काळे यांनी सांगितले की, “आयोजकांनी आमचा सत्कार करून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. भविष्यात निश्चितच समाजाच्या सेवेतून आम्ही याची उतराई करू.”

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रमेश जाधवर तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर, राष्ट्रपती पदक विजेते व माजी शिक्षण विस्तार अधिकारी अरविंदराव फुलारी,स्वप्नपूर्ती नागरी पतसंस्थेचे चेअरमन व उद्योजक विठ्ठल माने,संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी, दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी बालाजी आडसूळ, व्हॉइस ऑफ मीडियाचे शिक्षण विभागाचे राज्याध्यक्ष चेतन कात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच शिक्षण व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची रूपरेषा
या कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र बिक्कड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा व पालकांचा शाल, हार व स्टेथोस्कोप देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव खराटे यांनी केले, प्रस्ताविक आयोजक राजेंद्र बिक्कड यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप यादव यांनी केले.
विद्यार्थ्यांचा गौरव

एमबीबीएस प्रवेशित विद्यार्थी: श्रावणी श्रीधर रितापुरे, ओंकार प्रशांत काळे, समर्थ संजय भांगे, आदर्श औदुंबर रितापुरे, अजिंक्य अखिल कुलकर्णी, श्रावणी पांडुरंग टेळे.,सांची प्रिया सुधीर वाघमारे
एमडी प्रवेशित विद्यार्थी: शिवाई संतोष भांडे, स्वप्निल रामहरी मुंडे.
विशेष गौरव: सत्यजित चेतन कात्रे – (स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल).
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बाराते,सतिश मातने,रमेश अंबिरकर,विकास मुंडे यांनी परिश्रम घेतले.











Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798